येवढेच आठवते मला…

Indira Gandhi

येवढेच आठवते मला…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी येवढेच आठवते मला

आठवते…

मन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय

अन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा

आठवते…

वागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण

आठवते…

रेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट

आठवते…

पाहताक्षणीच चेहऱ्यावर दिसणारी

लपवता न येणारी

एक प्रचंड महत्वाकांक्षा

.

आठवते…

फिल्म डिव्हिजनच्या

कुठल्यातरी डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलेली

फुरसतीच्या क्षणी मुला-माणसांत नातवंडात

रमणारी एक लेकुरवाळी आजी

अन् दिवसातले उरलेले सोळा-अठरा तास व्यापणारा

एक असामान्य झंझावात.

.

आठवते…

एका खंडप्राय देशावर, षंढप्राय राजकारण्यांवर

एक-दीड दशक गाजवलेला

एक विलक्षण पुरुषार्थ.

“नष्टासी नष्ट योजावा

हुंब्यासी हुंबा लावून द्यावा”

ह्या दासबोधोक्ती न वाचता देखिल

सही सही व्यवहारात आणणारा

एक लोकविलक्षण मुत्सद्दी.

आयुष्याच्या उत्तरार्धानंतरही

पुत्रवियोगाचा चटका आणि

सत्तेच्या राजकारणातील

लाजीरवाणा पराभव पचवून

उण्यापुऱ्या दोन वर्षांत

फिनिक्स पक्षाप्रमाणे

उभारी घेतलेले एक चैतन्य

अन् पुनर्विजयाच्या दिशेने सुटलेला

एक झंझावाती अश्वमेध.

– – –

कदाचित

३१ ऑक्टोबर नंतर

सवडीने…सावकाश…

सारासार विचार करता…

किंवा कसोट्यांचे दगड लावता…

आठवतील कदाचित

काही वेगळ्या गोष्टी

काही अस्वस्थ करणारे उध्वस्त तपशील

उलट-सुलट विचारांची आवर्तने

कदाचित मनाला

वेगळ्याच निष्कर्षाप्रत नेतील.

तरीदेखील…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी

येवढेच आठवते मला

-शरदमणी मराठे

३१ ऑक्टोबर १९८४

Posted in Uncategorized | 7 प्रतिक्रिया

अटलजी ९०

atalji newspaper

अटलजी

 तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले
 ते आज आठवत नाही.
 एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी
 ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील
 काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून

 “अप्रमादयुक्त कवी…
 कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये
 जो आहे सत्याने जाणारा…
 सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा…
 हा धर्मोपदेशक आम्हाप्रत
 सर्वं दैवी शक्तींना घेऊन येवो”

 तेव्हा मात्र मला तुमचीच आठवण आली.
 काल रात्री तुमच्याच कविता वाचत
 खूप उशिरापर्यंत जागलो होतो.
 …तुम्हाला पहिल्यांदा केव्हा पाहिले
ते मात्र आठवत नाही.

atalji bhashan2

 .

.

 एकदा…अंधुकसे आठवते…
 मी अर्ध्या चड्डीवर…
 छातीला ‘दीपकाचा’ बिल्ला लावून पाणी वाटत होतो
 अन् कफ परेड वरून चालला होता तुमचा जयघोष…
 हजारो आत्मविश्वासपूर्ण घोषणा
 एका उघड्या जीपमधून
 तुम्ही मात्र स्थितप्रज्ञासारखे निघून गेलात
 तुमच्या जयघोषाला सहजपणे मागे ठेवून…
 (…आणि हे ही आठवते…
 त्या गडबडीत माझ्या बाबांनी खाऊकरता दिलेले आठ आणे
 पाणी वाटता वाटता माझ्याच उंचीच्या पाण्याच्या पिंपात पडले होते)

 असेच एकदा…
 आणीबाणी मध्ये…एका लेंगावाल्या माणसाला
 आईने दिले होते पदरा मध्ये बांधलेले पन्नास रुपये
 काहीही न बोलता.
 त्याने दिलेल्या पत्रकावर होता
 तुमचाच एक दिलखुलास फोटो.
 तेच जीपवरल्या सारखे मंद हास्य.
 मला तो फोटो हवा होता वहीवर चिकटवण्यासाठी.
 आईने लगबगीने ओढून घेतले ते पत्रक
 अन् पाणी तापवण्याच्या बंबात टाकून दिले…

आणि ही गोष्ट मात्र तशी माझ्या तरुणपणीची.
मी कॉलेजमध्ये होतो.
क्रिकेट टेस्ट सुरू नव्हती;
तरी होता आमच्या हातात ट्रान्झीस्टर
अन् ऐकत होतो रात्रभर जागून निवडणुकांचे निकाल.
जेव्हा प्रचंड मतांनी तुम्ही जिंकल्याचे कळले तेव्हा
सर्वांना कटिंग चहा पाजला होता स्टेशनवर.
दुसऱ्याच दिवशी तुमचा फोटो होता पेपरमध्ये
पुन्हा तेच हास्य…
atalji kavyavachan
त्यानंतरची
 आठवते आहे तुमची प्रत्येक जाहीर सभा.
 ज्यामधून तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने ओतायचात
 समोरच्या श्रोत्यांमध्ये एक दैवी चैतन्य…
 हशा…टाळ्या…हे तर अगदी हुकमी…
 …कधीकधी कातरही व्हायचा तुमचा हळवा स्वर.
 अन् व्याकूळ व्हायचात सभोवतालच्या गंभीर स्थितीने.

 आठवते
 सागरकिनारी…विशाल जनसागरापुढे
 तुमचे प्रभावी…प्रवाही काव्यवाचन
‘ हिंदू तनमन’…किंवा ‘हृदय चाहिये’च्या शब्द लहरींना पाहून
 सागरही अवाक व्हायचा तेव्हा
 अंगावर उभा राहिलेला काटा आजही आठवतोय.
.
.
.

atalji with pet
 अटलजी,
 तुमची प्रत्येक आठवण शीतल झुळूक वाटते शरदातली
 तुम्ही मिळवली एक नि:संदिग्ध लोकप्रियता
 पण त्याकरिता नाही घेतल्यात चुकूनही
 जाती-पातीच्या कुबड्या…
 किंवा भाषांच्या प्रेमा-द्वेषाचे पांगुळगाडे
 नाही कधी केल्यात जाहीर चित्र-विचित्र मर्कटचेष्टा
 नाही केली कधी भारतयात्रा…लॉंगमार्च…
 असल्या बेगडात गुंडाळलेली आडमाप तंगडतोड.
 तरिही जमवलात तुमच्या आठवणीने हुरळून जाणारा…
 प्रेरित होणारा…सद्गदित होणारा…
 मनमोकळा हसणारा…डोळे पानावणारा…
 अन् ‘साला अटलजीका जवाब नही’ असे म्हणणारा…
 उदंड लोकसंग्रह.
 राजकारणात पूर्ण बुडूनही
 कसे राहिलात कमलपत्रागत नामानिराळे
 ह्या राजनीतीच्या जंगलात तुमच्या काळजाचा
 प्रत्येक ठोका अजून जिवंत आहे ह्याचे आश्चर्य वाटते.
 कसे मिळवले लोकांचे प्रेम असे हजारोंच्या हिशेबात?
 …भारतीय राजकारण्यांना हसणाऱ्यांचा…मुरकणाऱ्यांचा…
 टाळ्या हाणणाऱ्यांचा…नाही पडला कधी तुटवडा.
 पण आत्यंतिक प्रेमापोटी तुमच्यावर हक्काने रागावणारा
 गोतावळा तुम्हाला लाभला हे तुमचे भाग्य…अन् आमचेही.

atalji nisargat आठवते…
 “काही म्हणा पण अटलजींचे हे चुकलेच…”
 किंवा
 “आता काही सुद्धा बोलू नकोस बीजेपी बद्दल…”
 असे वेळी-अवेळी म्हणणाऱ्या
 सत्तरीच्या आजोबांना विचारले होते मी एकदा
 “आजोबा, एवढे कावता…त्रागा करता…
 …अविश्वासही दाखवता कधीमधी
 पण दर निवडणुकीला श्रद्धेने जायचात
 आणि उठवायचात शिक्का दिपकावर
 …अन् आता कमळावर……हे असे कसे?”
तेव्हा गळा दाटून आला त्यांचा
अन् मोतीबिंदू झालेल्या डोळ्यात तरळली
आणखी दोन मोत्ये…
ती टिपत म्हणाले आजोबा एवढेच…
“अरे पोटचा गोळा आहे काही झाले तरी…”

atalji talwar अटलजी
 हळूहळू लोकांना कळू लागल्या
 राजबिंड्या राजपुरुषांच्या आणि राजकुलांच्या मर्यादा…
 हळूहळू समजत गेले आहे आपले भलेबुरे लोकांना.
 ठिकठिकाणच्या निराशा आणि असहाय्यता
 उभी करीत आहेत मोठी मोठी प्रश्नचिन्हे.
 अचानक लुप्त झालेल्या विकास प्रवाहांच्या बाबत
 लोक नशिबाला सोडून निवडून आलेल्यांना विचारत आहेत जाब.
 ह्या बदलत्या वास्तवात
 दीनदयाळांच्या प्रेरणा अंगी बाळगणारा
 तुमचा हा गोतावळा.
 क्रमाक्रमाने होणार आहे यशस्वी

याबद्दल पुसटही शंका नाही माझ्या मनात.
मात्र तोपर्यंत
निर्भीडपणे उभे ठाकण्याची शक्ती आम्हास मिळो.
हीच प्रार्थना ईश्वरचरणी
तुमच्या नव्वदाव्या जन्मदिवसा निमित्ताने.

-शरदमणी मराठे 
sharadmani@gmail.com

Posted in कविता | Tagged , , | 79 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५


RTW logo
.

.

.

.

.

.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, अजून किती अवधी आहे युध्द सुरू होण्याला? मी युध्दाचे विवरण ऐकायला उत्सुक आहे. प्रत्यक्ष शस्त्रात्रे न चालवता होणारे हे युध्द असते तरी कसे? गेले काही दिवस तुझाकडून जे ऐकतो आहे, तेच इतके रोचक आहे. मग हे प्रत्यक्ष युध्द असेल तरी कसे? हे जाणून घेण्यास मी उतावीळ झालो आहे.

संजय म्हणाला – (उतावीळपणा हा तर कुरुवंशाचा खानदानी रोग दिसतो आहे!) महाराज, मी पूर्वीच तुम्हाला सांगितले आहे की जसे भारतीय युध्दात प्रत्येक लढवय्याकडे त्याचे-त्याचे शस्त्र होते, तसे प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला त्याचे ‘मत’ हे प्रभावी अस्त्र असते. एका यंत्रात गुप्तपणे त्यांचे मत नोंदले जाते आणि जास्त मते मिळवणारा लोकांचा प्रतिनिधी म्हणून विजयी होतो.

धृतराष्ट्र म्हणाले – पण संजया, तू मागे म्हणालास की प्रत्येक पक्षाला वेगवेगळे चिन्ह असते, ते कशासाठी?

संजय म्हणाला – हो महाराज, सांप्रत नव्या भारतात प्रत्येक उमेदवारासमोर त्याच्या त्याच्या पक्षाचे चिन्ह असते. त्या चिन्हासमोरील बटण दाबून मत नोंदवता येते. उदा., तुम्हाला माहीत असलेल्या रामायणातील पंचवटी परिसरातील – म्हणजे पांडवलेण्याच्या परिसरात जोर असणाऱ्या एका पक्षाचे चिन्ह आगगाडी नावाच्या अग्निरथाचे इंजीन आहे, तर जुन्या हस्तिनापूरच्या परिसरातील एका पक्षाचे चिन्ह पायांनी चालवण्याचे – म्हणजे माणसाच्या पायांनी चालवण्याचे – एक वाहन ‘सायकल’ हे आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, ह्याचा अर्थ पांडवलेणी परिसरातून इंद्रप्रस्थ दूर आहे, म्हणून स्वयंचलित इंजीन आणि जवळच्या प्रदेशात पायाने चालवण्याची सायकल अशी विभागणी आहे का?

sarga 5.

.

.

.

.

.

.

.

.

.

संजय (स्मितहास्य करीत) म्हणाला – महाराज, हे दोन पक्ष, त्यांची प्रभावक्षेत्रे आणि त्यांची निवडणूक चिन्हे यांच्याबद्दल जरी हे योगायोगाने खरे असले, तरी तो काही निकष नाही. वाहनाव्यतिरिक्तही चिन्हे असतात महाराज. तीन पानांपासून कमळाच्या फुलापर्यंत आणि झाडूपासून हत्तीपर्यंत विविध चिन्हे असतात.

धृतराष्ट्र म्हणाले – पण लोकांना कसे कळते की कुठल्या पक्षाचे कुठले चिन्ह ते?
संजय म्हणाला – महाराज, टीव्हीवर, सिनेमाघरात जाहिरातींचा भडिमार असतो. शिवाय इंटरनेटवरदेखील पक्ष आणि उमेदवार भरपूर प्रचार करतात. (महाराजांच्या चेहऱ्यावरील बदलत्या रेषा ह्या ‘डेव्हलपिंग’ प्रश्न-दर्शक आहेत, हे आधीच ओळखून संजय पुढे म्हणाला…) महाराज, आता कृपया ‘इंटरनेट म्हणजे काय?’ हा प्रश्न आपण विचारू नये. कारण ज्यांना इंटरनेट माहीतच नाही, त्यांना आगाऊ कुतूहल ‘बाळगण्याचा’ अधिकार नाही सांप्रत भारतात!

धृतराष्ट्र (हताशपणे) म्हणाले – एव्हाना मला माझ्या मर्यादा कळू लागल्या आहेत संजया. मला तू जे कथन करतो आहेस, तेच पुरेसे आहे. पण मला एक सांग की पूर्वी जेव्हा टीव्ही, तितक्या प्रमाणात सिनेमाघरे, इंटरनेट वगैरे गोष्टी नव्हत्या, तेव्हा लोकांना पक्षाबद्दल, उमेदवाराबद्दल वा त्यांच्या विचाराबद्दल कसे समजायचे?

संजय म्हणाला – महाराज, तेव्हा काही प्रमाणात हे काम वर्तमानपत्रातून व्हायचे. पण त्याहीपेक्षा प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असायचे. प्रत्येक वस्तीत-वाडीत असणारे त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे विचार, कार्यक्रम, उमेदवार, निवडणूक चिन्ह अशासारख्या गोष्टी घरोघरी पोहोचवायचे. अनेक कार्यकर्ते ‘घरचे’ जेवून ‘आपल्या’ पक्षासाठी ‘राबायचे’ आणि आपल्या उमेदवाराच्या विजयात आपला विजय मानायचे.

धृतराष्ट्र म्हणाले – मग कार्यकर्त्यांचे तसे जाळे सध्या नसते का?

संजय म्हणाला – फारसे नसते महाराज. काही पक्षांकडे त्यातल्यात्यात ही परंपरा टिकून आहे. पण बहुतांश ठिकाणी पैसे घेऊन काम करणारी माणसे आहेत. ते कार्यकर्ते नाहीत, तर कर्मचारी आहेत. काही ठिकाणी पत्रके वाटणे, पोस्टर लावणे, बॅनर बांधणे, कार्डे लिहिणे आणि वाटणे अशी कामे कंत्राटाने करणारे लोकही आहेत. इतकेच काय, तर सभेला गर्दी आणणे, मिरवणुकीत वाहने आणणे असे काम करणारेदेखील कंत्राटदार आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे तर विचित्रच ऐकतो आहे काहीतरी. कार्यकर्ते कमी कशामुळे झाले असतील, संजया? भारताची लोकसंख्या अचानक कमी झाली की काय?

संजय म्हणाला – छे छे, महाराज, तसे काही नाही. जवळपास सव्वाशे कोटी लोक आहेत ह्या देशात. भारतीय युध्दकाळात सगळया जगाची लोकसंख्या जितकी होती, त्याहूनही जास्त लोक एकटया भारतात आहेत… आणि त्यातले निदान निम्मे तरी पन्नाशीच्या आतले आहेत… म्हणजे ‘कार्यकर्ते’पणासाठी फिट आहेत. पण महाराज, लोकांचे रोजचे आयुष्य कटकटीचे झाले आहे. घरी स्वस्थ असणारा माणूस समाजाचा-देशाचा विचार करेल; पण ज्याला दोन वेळची भ्रांत आहे, तो कसा काम करेल?

धृतराष्ट्र म्हणाले – पण संजया, ह्यापूर्वी अशा कितीतरी निवडणुका झाल्या असतील, कितीतरी वेळा लोकांनी आपले आवडते शासक निवडले असतील. तुला असे म्हणायचे आहे का की इतकी वर्षे होऊनही साध्या साध्या लोकांची दोन वेळची भ्रांतही दूर होऊ शकली नाही?

संजय म्हणाला – महाराज, दुर्दैवाने तुम्ही म्हणालात ते सत्य आहे. गेल्या काही दशकात ‘यूज ऍंड थ्रो’ नावाची सवय सर्वांनाच लागली. निवडून आलेला नेता पुढली पाच वर्षे त्याच पक्षात राहील की नाही, हे त्याचे त्यालाच माहीत नसते… तो कार्यकर्त्यासाठी काय तजवीज करणार? जेव्हा निवडून आल्याच्या मोठाल्या गाडया, मालमत्ता, चैनबाजी आणि संपत्तीचा कोटयानुकोटी वाढता आलेख दिसू लागला, तेव्हा कार्यकर्ताही ‘शहाणा’ बनला. घरून डबा घेऊन पक्षासाठी काम करणे तर इतिहासजमा झालेच होते. पण पक्षाच्या जीपमधून येणाऱ्या पुरी-भाजीच्या पाकिटावर काम करणारा कार्यकर्ताही हळूहळू इतिहासजमा झाला. महाराज थोडे स्पष्ट बोलतो, पण भाऊबंदकीच्या शापामुळे आणि सत्तेच्या लालसेपोटी तुमच्या पिढीने राजधर्म जो सोडला, तो आजवर कोणी धरलेलाच नाही. तुमच्या नागरिकांशी प्रतारणा करण्याची सुरुवात तुम्ही केलीत महाराज. आता होणाऱ्या राज्यकर्त्याच्या दिशेने हताशपणे एक ‘मत’ भिरकावण्यापलीकडे अधिक काही करण्याची कोणाची मनःस्थिती नाही.

संजयाचे हे परखड बोलणे ऐकून महाराज चांगलेच विचारात पडले. आणि ‘आज संध्याकाळी काय करावे? महाराजांसाठी केलेल्या रनिंग कॉमेंट्रीने डोक्याचा नुसता भुगा झालाय. रात्री क्वीन बघावा की डोक्याला ‘थंडा-थंडा-कूल-कूल’ तेल लावून झोपी जावे…’ ह्याचा विचार संजय करत राहिला.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, १३ एप्रिल  २०१४. )

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 3 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४

 

RTW logo.

.

.

.

.

.
संजय म्हणाला – महाराज, आता विविध पक्षांच्या उमेदवारांच्या जवळपास सर्व याद्या जाहीर झाल्या आहेत. कोण कु ठून आणि कोणासमोर लढणार, हेही आता नक्की झाले आहे. आपल्याला ‘तिकीट’ मिळाल्याची खात्री झाल्यानंतर प्रचाराच्या आखणीलाही आता वेग आला आहे. सर्वत्र…

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, तू काय मला गृहीत धरतो आहेस?

संजय म्हणाला – मी समजलो नाही महाराज?

धृतराष्ट्र म्हणाले – मी कु रुवंशातील सर्वात ज्येष्ठ पुरुष आहे. काही सांगण्यापूर्वी तू माझी परवानगी घ्यायला हवी. माझी ऐकण्याची इच्छा आहे की नाही? हे विचारायला हवे. मी तुझे कथन ऐकू इच्छितो की आणखी काही ऐकू  इच्छितो, हे ज्ञात करून न घेताच तू ‘सुरू’ कसा झालास?

संजय म्हणाला – क्षमा असावी महाराज. मला कल्पना नव्हती की तुम्ही आज माझे कथन ऐकायला उत्सुक नसाल. मी पुन्हा कधीतरी सांगेन.

धृतराष्ट्र म्हणाले – कमालच आहे. हेही तूच ठरवलेस मला न विचारता? तुला कोणी सांगितले मला ऐकण्याची इच्छा नाही म्हणून?

संजय म्हणाला – महाराज, माझा आता माझ्या डोक्याचे पार दही होऊन गेले आहे. मी सांगितले तरी रागावता आहात आणि नाही सांगितले तरी रागावता आहात. तुम्हाला ‘घोडा’ म्हणायचे आहे की ‘चतुर’ म्हणायचे आहे, ते एकदा स्पष्ट सांगा.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, मला इतकेच म्हणायचे आहे की माझ्या ज्येष्ठत्वाचा मान राखून तू सांगण्यापूर्वी माझी अनुज्ञा मागावीस. मला विचारावेस, ”महाराज, आता सांगू की मग सांगू?” मग मी तुला सांगण्यासाठी अनुज्ञा देईन. तसे मला युध्दाचा वृत्तान्त ऐकायचाच आहे, पण मला गृहीत धरलेले आवडत नाही.

संजय म्हणाला – क्षमा असावी महाराज. ह्यापुढे असा प्रमाद होणार नाही… तर मी सांगत होतो की आता बरेचसे उमेदवार जाहीर झाले आहेत,  कोण कु ठे लढणार हे आता नक्की झाले आहे. जिंकण्याची खात्री, इच्छा असणाऱ्या शिबिरात इच्छुकांची गर्दी उसळलेली दिसत आहे, तर हरण्याची शक्यता असणाऱ्या शिबिरात शुकशुकाट दिसतो आहे. तिथे कोणी स्वत:ऐवजी आपल्या तरुण मुलाला लढण्यासाठी पुढे करतो आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे तर विचित्रच ऐकतो आहे काहीतरी. स्वत:ऐवजी युवराजांना पुढे करतात म्हणजे कमालच आहे.

संजय म्हणाला – महाराज, इथे ‘बंदिवास’ टाळण्यासाठी आजारी पडून इस्पितळात भरती होण्याची प्रथा आजवर होती. पण आता लढत टाळण्यासाठी इस्पितळात भरती होणारे महाभाग दिसत आहेत. कुणाला आहे ती लढण्याची जागा बदलून हवी आहे, तर कुठल्या पक्षप्रमुखांना उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी ‘मोर्चा’ सांभाळायला हवे आहे, तर कु णी ‘आपल्या सैन्याचे मत घेऊन मगच लढायचे ठरवेन’ अशी गर्जना करतो आहे.

धृतराष्ट्र म्हणाले –  हे तर आमच्या वेळच्या युध्दापेक्षा रोचक होत चालले आहे. त्या वेळी दोन्ही बाजूचे वीर नुसते फुरफुरत होते. वीरश्री मिळते की वीरगती? हा नशिबाचा खेळ होता. पण लढण्याचे कर्तव्य कोणी सोडले नाही.

संजय म्हणाला – महाराज, एक आठवण करून देतो. लढण्याचे कर्तव्य सोडण्याची भाषा मात्र झाली एका वीराच्या हातून आणि तो होता अर्जुन. आणि त्याने तशी भाषा करण्याचे कारण होते ‘समोर’ उभे ठाकलेले आपले ‘आप्त’ ‘स्वकीय’ आणि ‘गुरुवर’. अर्थात त्याला सबुरीचे दोन शब्द सुनवून कर्तव्याची जाणीव देणारा श्रीकृष्ण होता तेव्हा.

धृतराष्ट्र म्हणाले – मग आज हे सबुरीचे शब्द सांगणारा कोण आहे ह्या युध्दात?

संजय म्हणाला – ‘समाजाने राज्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे’ असे म्हणणारे पुष्कळ जण आहेत महाराज. ते काम करण्याची इच्छा असणारे किंवा ते काम आम्हीच करणार असे म्हणणारे बरेच आहेत. पण तसे परिणामकारकपणे करू शकणारे मात्र दुर्दैवाने कोणीच नाही, महाराज.
sarg 4.

.

.

.

 

 

.

.

धृतराष्ट्र (हताशपणे) म्हणाले – अरे अरे, ही तर फारच वाईट परिस्थिती आहे, संजया!

संजय म्हणाला – हे तर काहीच नाही महाराज. आणखी असे की ‘समोर’ उभे असणारे आप्त, स्वकीय आणि गुरुजन ‘समोरच’ दिसू शकतात, पण शेजारी उभा असलेला आप्त, स्वकीय आणि गुरुजन यांच्यापैकी एखादा मनाने ‘शेजारी’ नसून ‘समोर’ असतो, ही परिस्थिती आणखीनच गंभीर असते. तुम्हाला हे सर्व नवीन तर आहेच, पण सहजपणे समजणारेदेखील नाही… हे मी समजू शकतो! त्यामुळे महाराज, वीरश्रीची आणि कर्तव्यभावनेची जागा आता भयाने आणि संशयाने घेतली आहे. खांद्यावर ‘ध्वजा’ तर आपलीच दिसते, पण चेहऱ्यावर ‘मजा’ तर भलतीच दिसते, असेही दिसू लागले आहे. काल आपल्यासाठी चर्चासत्रात भांडणारा अचानक आपल्यासमोर उभा ठाकलेला दिसतो, अशी परिस्थिती आली. आता अशा कठीण समयी दर संसदीय क्षेत्रागणिक मला सर्वत्र अर्जुनच अर्जुन दिसायला लागले आहेत आणि दर अर्जुनामागे एक कृष्ण उभा करण्याची ताकद ह्या समाजात नाही महाराज!

संजयाचे हे बोलणे ऐकून महाराज विचारात पडले आणि प्रश्न विचारेनासे झाले. संजयने ‘महाराजांची चिंतनाची वेळ झाली असावी’ असा ह्या शांततेचा सोयिस्कर अर्थ काढला आणि मघाशी महाराजांना समजावून सांगताना ‘घोडा तरी म्हणा किंवा चतुर तरी म्हणा’ हे म्हटलेले वाक्य लक्षात ठेवत आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत ‘जुन्या पडोसनची व्हीसीडी कु ठे मिळेल बरं…?’ असा विचार करत त्या दुकानाच्या दिशेने पोबारा करण्यासाठी दबत्या पावलाने महाराजांच्या कक्षातून काढता पाय घेतला.

 

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, ०६ एप्रिल  २०१४. )

 

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३

RTW logo

 

 

 

 

 

 

धृतराष्ट्र – बा संजया, नवे भारतीय युध्द सुरू झालेले दिसतेय. मला भेरींचे आणि अस्त्रांचे आवाज ऐकू येत आहेत.

संजय – महाराज, आपण शांत व्हावे आणि थोडा धीर धरावा. अजून युध्द सुरू व्हायला अवकाश आहे. युध्दाच्या विषयात असा उतावीळपणा बरा नव्हे. क्षमा असावी, पण ह्याच उतावीळपणामुळे ५००० वर्षांपूर्वी तुम्ही आणि तुमच्या युवराजांनी सगळा देश युध्दभूमी करून टाकला होता, ते विसरलात काय?

धृतराष्ट्र – नाही संजया, ते शल्य घेऊन तर मी असा भटकतोय सद्गतीविना इतका काळ. पण मी खरंच युध्द सुरू होताना येतात तसे भेरींचे आवाज ऐकले. पर्जन्यास्त्र, अग्नी-अस्त्र सोडल्याचेही आवाज ऐकले आणि मुख्य म्हणजे वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या माता-पत्नींचे विलाप ऐकले. तू नाही का ऐकलेस संजया?

sarga 3

 

 

 

 

.

.

 

 

 

संजय – ऐकले महाराज, सर्व ऐकले. पण त्यांचा आणि युध्दाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला आता सविस्तर सांगतो. सेमिनारमध्ये ज्ञानी माणसे सांगतात तसे, म्हणजे शेवटचा मुद्दा पहिल्यांदा, अशा क्रमाने सांगतो… महाराज, वीरगती प्राप्त झालेले वीर धारातिर्थी पडले, ते युध्दात नाही, तर ते आपल्याच प्रदेशातील शत्रूंकडून मारले गेले. गम्मत म्हणजे त्यांना मारणाऱ्यांना शत्रू म्हटलेलेदेखील अनेकांना आवडत नाही. आणि… आणखी दोन सागरी सैनिकांना वीरगती मिळाली, तीही शत्रूमुळे नाही, तर आपल्या युध्दसामग्रीत असलेल्या दोषांमुळे. पण तसे बोललेलेही अनेकांना आवडत नाही. निरनिराळया हिंसांबद्दल बोलताना निरनिराळे निकष लावण्याची पध्दत आहे सांप्रत भारतात…

धृतराष्ट्र – संजया, ते समजले. पण पर्जन्यअस्त्राचा आवाज मी ऐकला, त्याचे काय?

संजय – महाराज, मी पुन्हा विनंती करतो की आपण ५००० वर्षांपूर्वीच्या ‘सुवर्णकाळातून’ जितके लवकर बाहेर याल, तितके आपल्यासाठी चांगले आहे. तुम्ही ज्याचा आवाज ऐकलात, त्याला  ‘वॉटर कॅनन’ म्हणतात. एका शिबिरातले लोक दुसऱ्या शिबिराच्या कार्यालयावर चाल करून गेले आणि तुंबळ दगडफेक – खुर्चीफेक झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा जोरदार फवारा मारला, त्याचा आवाज होता. आणि मग त्याचाच बदला म्हणून दुसऱ्या शिबिरातल्या लोकांनी पहिल्या शिबिराच्या ‘टोप्या’ भर रस्त्यात जाळल्या. ह्या त्या मानाने क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही त्याला ‘पर्जन्य अस्त्र’ ‘अग्नी अस्त्र’ म्हणालात, त्याचे मला हसू येते आहे.

धृतराष्ट्र –  संजया, मला काही कळेनासे झाले आहे. भेरींचा, अस्त्रांचा, वीरगतीप्राप्त लढवय्यांचा संबंध ह्या लढाईशी नाही म्हणतोस, तर मग हे आत्ताचे भारतीय ‘युध्द’ असते तरी कसे, हे तू मला विशद करावेस. खरे तर मी सुरुवातीपासून हेच तुला सांगत आहे, पण तू मात्र ते सोडून सगळा फापटपसारा मला सांगत आहेस.

संजय – महाराज, मी पूर्वीच सांगितले की आता लोकांचे राज्य आहे. दर पाच वर्षांनी लोक आपला राज्यकर्ता निवडतात. अनेक वर्षे एकाच ‘शिबिरातील’ लोक वर्षानुवर्षे राज्य करत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंधरावीस छोटया-मोठया शिबिरातील लोक मिळून राज्य करतात. ह्या सर्व शिबिरातले लोक मिळूनदेखील राज्य करण्याइतकी संख्या होत नाही काही वेळा. मग शिबिराबाहेर ‘अपेक्षेत’ टेहळणारे, तिसऱ्या शिबिरात तात्पुरत्या ट्रंका-वळकटया ठेवलेले किंवा विरोधी शिबिरात असलेले पण विरोधाची जाणीव बोटचेपी असणारे असे सर्व मिळून राज्य करण्याचा प्रयत्न करतात.

धृतराष्ट्र – मला हळूहळू समजते आहे तू म्हणतोस ते. मी ज्या यंत्रावर मागे चर्चा ऐकली, त्याच यंत्रावर अनेक जण ‘आम्ही कुठल्याच गटात जाणार नाही’ किंवा ‘आम्ही सिस्टिम बदलण्यासाठी लढतो आहोत’ वगैरे बोलत होते. त्यातील एक जण कुठल्या भाषेत बोलत होता ते कळले नाही, पण निवेदक ‘द्रविड’ ‘द्रविड’ असे म्हणत होता. आणि बाप-लेकाच्या भांडणाबद्दलदेखील बोलत होता. पण ते मला काही कळले नाही.

संजय – होय महाराज. तो माणूस तामिळ भाषेत बोलत होता. पंडू महाराजांची ‘माद्री’ ज्या प्रदेशातून आली, त्या प्रदेशातील भाषा आहे. आणि तुम्ही ऐकलेत ते बरोबरच आहे. त्यांच्या शिबिराचे नाव आहे ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’.

धृतराष्ट्र – काय विचित्र नाव आहे संजया! (कधी नव्हे ते स्मितहास्य करीत महाराज म्हणाले.)

संजय  – महाराज, नाव विचित्र आहे हे तुम्ही बोलताय? महाराज, तुमच्या पिताश्रींचे नाव होते ‘विचित्रवीर्य’. असले ‘विचित्र’ नाव त्यानंतर गेल्या ५००० वर्षात कुणी आपल्या मुलांना ठेवले नसेल आणि तुम्ही म्हणता ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ हे नाव विचित्र आहे? आपल्या नावात ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ हे तीन शब्द असलेले मद्रदेशात निदान तीन पक्ष म्हणजे ‘शिबिरे’ आहेत महाराज.

राज्यकर्ते बनण्याच्या ‘मॉडर्न’ पध्दतीने आधीच कन्फ्यूज झालेले महाराज आता अशा विचित्र नावाने तीन पक्ष आहेत म्हटल्यावर आणखीनच कन्फ्यूज होऊन विचार करू लागले आणि त्यांचा, न पाहणारा, डोळा चुकवून संजय टीव्हीचा ‘चर्चासत्र’ चॅनल बदलून सिनेमाचा चॅनल शोधू लागला.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, २९ मार्च २०१४. )

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २

RTW logo

.

.

.

.

.

.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजया, नव्या भारतीय युद्धात ‘माझे’ आणि ‘पंडूचे’ काय करतात हे कथन करायला आता तरी आरंभ करशील का? (संजय ने उत्तर देण्यापूर्वी आपला मोबाईल सायलेंट वर टाकला आणि मनाशी म्हणाला गेल्या दहा वर्षांत किती सवय झाली ह्याची…जणू पाच हजार वर्षे वापरत आहे!)

संजय म्हणाला – महाराज काळ बदलला आहे. फक्त राजघराण्यातील लोक हे ह्या रणाचे नायक नाहीत. जो-जो इच्छुक आहे तो-तो ह्या रणात उडी घेऊ शकतो. हे जनतेचे रण आहे…राजे रजवाडे मुठभर उरले आहेत ह्या रणांत. पूर्वी ज्यांचा उल्लेख अमुक अक्षौहिणी वगैरे आकड्यात व्हायचा त्यातील प्रत्येक आकड्याला आता प्रत्येकी एक मत आणि एक आयडेन्टिटी मिळाली आहे. ते सर्व आज, टेक्निकली का होईना, पण राज्यकर्ते आहेत. त्यामुळे पुन्हापुन्हा ‘माझे’ आणि ‘पंडूचे’ असे सारखे विचारात जाऊ नका.

sarga_02 RTW.

.

.

.

.

.

.

..
.

धृतराष्ट्र म्हणाले – जर तू म्हणतोस तसे कोणीही रणात उडी घेतो आहे तर कोण कोणाविरुद्ध लढतो आहे आणि कोणासाठी लढतो आहे? हे कसे समजायचे?

संजय म्हणाला – महाराज हा लढा पूर्वापार चालत आलेला आहे. तेव्हा तो हस्तीनापुरच्या सिंहासनासाठी होता आज तो इंद्रप्रस्थाच्या म्हणजे दिल्लीच्या सिंहासनासाठी होत आहे. अर्थात फरक इतकाच की पूर्वी तसे मोकळेपणाने मान्य केले जायचे की ‘हो आम्ही सिंहासनासाठी लढतो आहोत’. तो काळच मुळी त्रेता-कली युगाच्या संधिकालाचा होता. आज टळटळीत कलियुग सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक लढणारा असे सांगेल की तो विकासासाठी लढतो आहे किंवा गुड-गवर्नन्स साठी लढतो आहे किंवा सेक्युलॅरिजम च्या रक्षणासाठी लढतो आहे. काही तर अमुक एक जण सिंहासनावर बसू नये यासाठी लढत आहेत.

धृतराष्ट्रा म्हणाले – बा संजया. माझ्या कानावर आरडाओरडा ऐकू येतो आहे. युद्ध सुरु झाले की काय?

संजय म्हणाला – महाराज धीर धरा. उतावळे होऊ नका. (बहुधा दुर्योधनाने बापाचाच गुण घेतला असणार!) महाराज हे युद्धाचे आवाज नाहीत. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आपापल्या पक्षाची – नेत्याची होर्डिंग, म्हणजे मोठी चित्रे , उतरवण्याची लगबग सुरु आहे महाराज आणि ते काढताना चाललेला आरडाओरडा आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – कोणाची आहेत चित्रे. आणि का उतरवत आहेत?

संजय म्हणाला – महाराज कोणाची आहेत हे सांगणे कठीण आहे. भरपूर चित्रे आहेत पुढाऱ्याच्या आजूबाजूला. जणू काही चक्रव्यूहात अडकला आहे पुढारी. बहुधा वरच्या ओळीतली चित्रे त्याच्या दिल्लीच्या नेत्यांची असावीत आणि खालच्या ओळीतील चित्रे स्थानिक कार्यकर्त्यांची. तसं पाहिलं तर ‘नेता’ बनणं हे चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा कमी गुंतागुंतीचे नसते महाराज. आणि होर्डिंग उतरवत आहेत ह्याचे कारण आता आचारसंहिता लागू झाली आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – बा संजया, ही आचारसंहिता काय असते? आम्ही ज्योतिष शास्त्रासंबंधी भृगुसंहिता, वैद्यकविद्येसाठी चरकसंहिता इत्यादींच्या बद्दल ऐकले आहे. आचारसंहिता काय करण्याचे शिक्षण देते? तिचा नव्या भारतीय युद्धाशी संबंध काय? आणि…

संजय (मध्येच अडवत) म्हणाला – महाराज तुम्ही अशी प्रश्नांची सरबत्ती करू नका… ‘आजच्या सवाल’ सारखी. तुमचा प्रत्येक प्रश्न पाच मार्कांचा, दीर्घोत्तरी, ऑप्शन नसलेला आणि ‘हॉट्स’ प्रकारातला आहे. मला समजावून सांगायला जरा वेळ लागेल. महाराज, आचार संहिता म्हणजे निवडणून जाहीर झाल्यावर उमेदवाराने, राजकीय पक्षाने आणि सरकारने काय करू नये याची नियमावली. थोडक्यात सांगायचे तर इतर संहिता काही करण्याविषयी शिकवतात तर आचारसंहिता न करण्याबद्दल शिकवते.

धृतराष्ट्र म्हणाले – मला समजले नाही. काही ‘न’ करण्याचे नियम कसे असू शकतात? उदा “आज मी काहीच करणार नाही” त्याला नियम कशाला. हो मी व्यापार करणार आहे, मी परीक्षा देणार आहे, मी प्रवास करणार आहे अशा गोष्टींना ते ते म्हणजे व्यापाराचे, प्रवासाचे, परीक्षांचे नियम असतात…

संजय म्हणाला – महाराज कृपा करून माझीच परीक्षा घेउ नका. ह्या ‘सिस्टीम’ चा मी काही प्रवक्ता नाही. जसे तुम्हाला प्रश्न पडत आहेत तितकेच किंवा त्याहूनही जास्त प्रश्न मला पडत आहेत. तरीही मी माझ्या अल्पमतीची पराकाष्ठा करत नम्र सेवा बजावत आहे ह्याची जाणीव असू द्यावी. निवडणुका जाहीर झाल्यावर योग्य मर्यादेत खर्च करणे, सत्तेवर असलेल्या पक्षांनी मतदारांना प्रलोभन देणारे वाटेल असे निर्णय घेऊ नये. म्हणजे एकंदरीतच महत्वाचे निर्णय सरकारांनी घेऊ नये. प्रचारामध्ये असत्यकथन करू नये. आपली निवडणूक पूर्व मालमत्ता काय आहे ते जाहीर करावी वगैरे. हे सगळे टी.एन.शेषन यांच्या काळात सुरु झाले. जी निवडणूक प्रक्रिया आपल्या लोकशाही रचनांच्या मूलस्थानी आहे तीच सदोष राहिली तर त्यावर उभा केलेला डोलारा कसा टिकणारा. त्यातूनच व्यवस्था परिवर्तनाचे टप्पे उलगडत जातील…

…त्यापुढे व्यवस्था, सिस्टिम वगैरे संजय बराच काळ बोलत राहिला. बराच वेळ धृतराष्ट्र महाराजांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया येत नाही हे लक्षात आल्यावर त्याने महाराजांकडे पाहिले असता त्याच्या लक्षात आले की आपण सिस्टीम आणि त्यातील बदल वगैरे बोलत असताना त्यांचा डोळा लागला. स्वाभाविकच आहे. अशा ‘रिफॉर्म’ च्या चर्चा सुरु असताना सोयीस्कर दुर्लक्ष्य करीत डुलक्या काढण्याचा राजकारण्यांचा क्रम गेली पाच हजार वर्षे चालत आला आहे.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४. )

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

RTW logo

संजय म्हणाला – हे धृतराष्ट्र महाराज, मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की तुम्ही माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला ‘विथ इमिजिएट इफेक्ट’ मुक्त करावे. कृपया माझे आयकार्ड, रथाचा पार्किंग पास आणि दिव्य दृष्टी परत घ्यावीत. मला ह्या दिव्य दृष्टीचा काय बरे उपयोग. सर्वत्र सी.सी.टीव्ही असताना हे जुनेपुराणे दिव्य डोळे तुम्हाला सेवा देण्यात कुचकामी आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय. तुला दिव्य दृष्टी देणाऱ्या देवाने तोच वरदहस्त अक्कल देताना का बरे ठेवला नाही? अरे मूढा युद्ध नव्या तंत्राने नव्हे तर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जिंकले जाते.

संजय म्हणाला – हे हस्तिनापुर सम्राट. मान्य आहे पण मी थोडाच युद्ध लढणार आहे. माझे काम तर केवळ ‘रनिंग कॉमेंट्री’ करण्याचे आहे. आणि सी.सी.टीव्ही, उपग्रह वाहिन्यांच्या ह्या काळात मी हे काम का करावे? आता माझे वयही झाले आहे. दिव्य असली तरी दृष्टी साथ देत नाही. शिवाय आता इहलोकी कुठल्याच ‘दिव्य’ गोष्टीस फारसे वलय राहिले नाही महाराज. आता मला दिव्य दृष्टी सोडून आणि थ्री.डी. चष्मा घालून एखादा थ्री.डी. सिनेमा पाहण्याचा मूड आहे…

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजया, हे भलतेच काय मनात घेतले आहेस. जर तू मला रणांगणात काय घडते ते सांगितले नाहीस तर मला कळणार तरी कसे की ‘माझे’ आणि ‘पांडूचे’ रणात काय करीत आहेत!

sarga 1

संजय म्हणाला – ठीक आहे. पण एकतर इहलोकी ‘रण’ नावाचा विवक्षित एरिया नसतो. अख्या उभ्या-आडव्या भारतदेशाचेच एक रणक्षेत्र झाले आहे. आता कितीही दृष्टी ‘दिव्य’ दिलीत तरी मी सर्व ठिकाणचे कथन कसे करणार. शिवाय इहलोकी ‘स्टिंग’ ऑपरेशन करणारी एक जमात मला चांगलीच स्पर्धा करणार अशी चिन्हे आहेत. त्यांच्याकडे बजेटही भरपूर आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, तू बजेटचे कारण मला सांगू नकोस. माझ्या मेव्हण्याला, शकुनीला, सांगायचा अवकाश तुला हव्या तेवढ्या सुवर्ण-मुद्रा अलॉट होतील. (“बापाची पेंड!” संजय मनात उद्गारला…”इथे उचापती करण्यापेक्षा कंधार नरेशांनी आपल्या देशाकडे लक्ष दिले असते तर तिथे तालिबानी कशाला घुसले असते?” पण राजापुढे हे बोलण्यात अर्थ नसल्यामुळे त्याने मौनाचा सुज्ञ-मार्ग पत्करला).

संजय म्हणाला – ते ठीक आहे महाराज. पण नव्या तंत्राचा तुम्हाला परिचय झाल्याशिवाय तुम्ही तुमचा हेका (आणि माझा नाद!) सोडणार नाहीत. मी तुम्हाला एक ‘चर्चासत्र’ दाखवणार आहे. त्या चर्चासत्रात देशभर असलेले विद्वान आपापल्या ठिकाणाहून चर्चेत भाग घेणार आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, ‘आपल्या’ जुन्या महाभारतात सर्पसत्र झाले होते ज्यात सर्व सर्पांचा विनाश झाला होता. इहलोकी चर्चासत्र चर्चेचा विनाश करण्यासाठीच योजतात का? महाराजांच्या ह्या थेट प्रश्नाने संजय चांगलाच दचकला आणि सावरून आपल्या दिव्य-दृष्टीने महाराजांसमोर टीव्ही चर्चांचा सीन उभा करू लागला.

संजय म्हणाला…”हे महाराज, एकमेकांवर आरडाओरडा करून, चर्चा चालवणाऱ्यावर आणि परस्परांवर हेत्वारोप करताना पाहिल्यावर जरी तसे वाटत असले की हे सारे चर्चेच्या – संवादाच्या विनाशासाठी चालले आहे तरी तसे ते नाही. चर्चासत्र हे ‘रण’ सुरु होण्यापूर्वीचे सर्वसंमत आन्हिक झाले आहे. ही लोकशाही आहे आणि इथे प्रत्येकाच्या म्हणण्याला महत्व आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रत्येकाच्या समोर एका छोट्या आणि काळ्या गदेसारखी दिसणारी वस्तू हे ‘संहाराचे’ शस्त्र नसून ते माईक नावाचे ‘संवादाचे’ आयुध आहे. ज्या योगे चर्चा करणाऱ्याचा आवाज पूर्ण भारतभूमीवर पसरत आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, तू म्हणतोस ते खरे असेलही पण मला तर अधूनमधून द्वंद्व-युद्धासाठी , गदायुद्धासाठी एकमेकांना आव्हान द्यावे असे शब्द कानावर येत आहेत. शिवाय मघाशी आपल्या विजयाची ग्वाही देणाऱ्याचे भाषण झाल्याझाल्या कोणीतरी स्नानाची चर्चा सुरु केल्याचे आणि वाहत्या पाण्याचा आवाज आल्यासारखे वाटले ते कशामुळे?  की माझी काही ऐकण्यात चूक झाली.

संजय म्हणाला –  नाही महाराज आपली चूक कशी होईल? आपण तर महाराज! (दृष्टी गेलेय, पण म्हाताऱ्याचे कान तिखट आहेत!) मीच सांगण्याकडे दुर्लक्ष्य केले. अशा चर्चांचा खर्च वसूल करण्यासाठी स्नानाच्या साबणाची जाहिरात लागली होती महाराज. मी अनवधानाने माझ्या ‘दिव्य दृष्टीचा’ ब्लू टूथ बंद करायला विसरलो. क्षमा असावी.

धृतराष्ट्र म्हणाले – पण आता चर्चासत्र संपल्या-संपल्या युद्धाला प्रारंभ होणार का? मघाशी चिन्हे तर तशीच दिसत होती.

संजय म्हणाला – प्रत्यक्ष युद्ध आरंभ होण्यास अजून अवकाश आहे महाराज. आज तर केवळ पहिला ‘शंखध्वनी’ झाला आहे. नऊ चरणात रण होणार आहे इतके सांगण्यापुरता. अजून सेना समोरासमोर यायला बराच अवकाश आहे. आपल्या सेनेत कोण – समोर कोण हेही अजून स्पष्ट व्हायचे आहे. काही वर्षांपूर्वी ‘आपले’ असणारे, ‘बंधू’ असणारे,  ‘गुरुजन’ असणारे लढण्यासाठी ‘समोरासमोर’ येण्याची परंपरा गेली पाच सहस्र वर्षे कायम आहे महाराज.

…‘तेव्हा’ पहिल्या अध्यायात अर्जुनाला विषाद झाला होता. आज धृतराष्ट्र महाराज विषादाने मान हलवू लागले आणि त्यांचे लक्ष नाही हे लक्षात येताच संजय ऑस्कर प्राप्त ‘थ्री.डी.- ग्रॅव्हिटी’ कुठे लागलाय ते पेपरात शोधू लागला.
.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४. )

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 6 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: सात जानेवारीच्या शुभेच्छा…

सात जानेवारीच्या शुभेच्छा…
.
RTW logo
.

.

.

.

.

नवे वर्ष सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. नववर्ष संकल्पांचा उत्साह आता ओसरला असेल. स्वत:च्या सातत्याबद्दलच्या आपल्या भरमसाठ कल्पना ठिकाणावर आल्या असतील आणि अशा प्रसंगी जर एका अनपेक्षित कॉर्नर मधून चार समजुतीचे शब्द कानावर आले आणि मित्रत्वाचा सांत्वनपर हात पाठीवरून फिरला तर किती आनंद वाटेल? आपल्याला त्या आनंदाचा प्रत्यय निदान अंशत्वाने तरी मिळावा म्हणून हा लेखनप्रपंच आणि म्हणूनच सात जानेवारीच्या मित्रत्वाच्या शुभेच्छा.
.
7 janevarichya shubhechha.

एक जानेवारी. नव्या वर्षाचा पहिला दिवस. अनेक जुनेच संकल्प नव्या उत्साहाने पुन्हा करण्याचा दिवस. शालेय वयात असताना रोज दैनंदिनी लिहिण्याचा संकल्प करून एका एक जानेवारीला रात्री पूर्ण दिवसाचा वृत्तांत खुलासेवार लिहिल्याचे मला आठवते आहे. त्या दिवशी मला ते एक पूर्ण पानही अपुरे वाटले होते. संक्रांती पर्यंत तो उत्साह अर्ध्या पानावर आला. आणि संक्रांती पासूनच डायरी लेखनाच्या उत्साहावर जी संक्रांत आली आणि त्यामुळे ३० जानेवारीचा हुतात्मा दिन लेखणीने दिवसभर मौन पाळल्यामुळे कोराच गेला. वाढत्या वयानुसार डायरीचा आकार, किंमत इ. गोष्टी वाढत गेल्या तरीदेखील डायरी लेखनाची स्थिती कमी-अधिक प्रमाणात तशीच राहिली.

.

जी गोष्ट डायरी लिहिण्याची, तीच गोष्ट व्यायामाची, हस्ताक्षर सुधारण्याची आणि ‘यंदा अभ्यास नीट करायचा’ असे ठरवण्याची. दरवर्षी ३१ डिसेंबर च्या रात्री हे सारे फसलेले संकल्प अक्राळ-विक्राळ भुते होऊन स्वप्नात येतात. मी दचकून जागा होतो. उरलेली रात्र झोपे शिवाय जाते. कधीतरी पहाटे डोळा लागतो आणि नव्या वर्षी जाग येते तेव्हा घड्याळात सात-साडेसात वाजलेले असतात…आणि या वर्षी लवकर उठण्याचा संकल्पही जुन्या यादीत जाऊन पडतो.

त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी की आपल्या देशात नववर्ष दिन बरेचदा येतात. एक जानेवारी झाल्या नंतर दोन-तीन महिन्यातच गुढीपाडवा येतो. हिंदू पंचांगा प्रमाणे येणारा हाही एक नववर्षदिनच असतो. त्याच सुमारास एक एप्रिलला येतो आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. सर्व व्यावसायिक, व्यापारी, उत्पादक यांच्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. व्यापाराच्या, कारखानदारीच्या नावाखाली लोकांना ‘फूल’ करणारेही काही महाभाग असतात. त्यामुळे आर्थिक नववर्षदिन ‘एप्रिल फूल’ च्या दिवशी यावा हा योगायोगच नाही का?

त्यानंतर कधीतरी जून महिन्यातच शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या दृष्टीने एका नव्या वर्षाचा आरंभ होतो. विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुक्रमे इयत्तेत व सिनीऑरिटी मध्ये एका वर्षाने  वाढ होते. त्यानंतर ऑगस्ट च्या मध्यावर येतो स्वातंत्र्यदिन. आपला देश आणखी एका स्वतंत्र वर्षात पदार्पण करतो. नंतर ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये येतो दिवाळीचा पाडवा. विक्रम संवताचा पहिला दिवस. अनेक व्यावसायिक, व्यापार्‍यांसाठी नव्या वर्षाच्या चोपड्या घेण्याचा मुहूर्त. ह्याच सार्‍या कालखंडात आपला एक वाढदिवसही यतो. आपल्या दृष्टीने तोही खरा नववर्ष दिनच असतो. त्याव्यतिरिक्त नवरोज, ईद अशांसारखे सेक्युलर नववर्ष दिन येतात ते वेगळेच.

एखाद्या चांगल्या कामासाठी, निश्चय करण्यासाठी, संकल्पासाठी एखाद्या एक तारखेचे, एखाद्या नववर्षदिनाचे निमित्त शोधणार्‍या माझ्या सकट अनेकांना वर्षाकाठी बरेचदा येणारे हे सर्वच नववर्षदिन एखाद्या पर्वणी सारखे वाटतात. आपणा सर्वांना ह्या नव्या वर्षाच्या पहिल्या नववर्षदिनी भरपूर शुभेच्छा तर मिळाल्या असतीलच. पण आता, सात जानेवारीला, सेल्फ रिअलायझेशनच्या अत्युच्च क्षणी मी आपल्याला शुभेच्छा देतो आहे.

आता आपल्या जी-मेल अकौंट ची साफसफाई एक जानेवारीला झाली नाही. ठीक आहे…हा काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही. फेसबुक वा तत्सम इ-टवाळखोरीत एका वेळेस मोजकी दहा…फार तर पंधरा मिनिटेच घालवायची हे पहिल्या आठवड्यात नाही जमले. इट्स ओके जमेल हळूहळू. कदाचित ‘तिथला’च एखादा ह्याबद्दल चांगली टीप देऊन जाईल. कुठल्याही प्रकारे ‘कनेक्टेड’ नसलेल्या वयस्क मामीला, मावशीला, काकाला भेटायचे राहून गेले पहिल्या आठवड्यात…अहो चालायचेच! अजून तीन विकेंड, एक ईद आणि एक २६ जानेवारी आहे की वट्ट! तेव्हा जमवा.

मुद्दा असा, की हे सर्व करण्याची धडपड आपण मनात बाळगतो हे तर आपल्या मनाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. ही उभारीच नसेल तर काय उरेल आपल्याकडे? तेव्हा ह्या शुभेच्छा सदोदित आहेतच तुमच्यासाठी आणि तुमच्या बरोबर. ह्या वर्षातल्या कुठल्याही महिन्यासाठी कुठल्याही तारखेसाठी आणि कुठल्याही आठवड्यासाठी. लाइफटाइम व्हॅलिडीटी असलेल्या. त्या कधीही उघडा आणि वापरा. ६, १३, १९, २७…कधीही वापरा. तूर्तास ह्या स्वीकारा. सात जानेवारीच्या मनापासून शुभेच्छा!
.
(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक,  जानेवारी २०१४)

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: माझ्या स्वप्नातील साहित्य संमेलन

माझ्या स्वप्नातील साहित्य संमेलन – अर्थात स्वप्न ‘आसव’दत्तम्
.
RTW logo.

.

.

.

.

‘मेरे सपनोंका भारत’ सारखे माझ्या स्वप्नातले साहित्य संमेलन कसे असेल? माझ्या ‘दिवास्वप्ना’तील काही क्षणचित्रे.

मराठीतील तीन ज्येष्ठ साहित्यिकांची नावे समितीने काढली होती त्यातील तिघांनाही समितीतील ज्येष्ठ सदस्यांनी संपर्क साधला असता त्यांनी विनम्रपणे नकार देत समितीला असे लिहिले … “यंदा माझ्या नावाचा विचार करू नये. कारण उरलेल्या दोन साहित्यिकांचे योगदान अमुल्य आहे, अतुलनीय आहे. त्यांना डावलून ह्या मनाच्या पदावर बसणे म्हणजे देवी शारदेचा तर अवमान ठरेलच पण माझ्यावरही अप्रामाणिकपणाचा कलंक लागेल” उर्वरित दोन जणांपैकी वयाने ज्येष्ठ साहित्यिकाला यंदा अध्यक्षपदी मनोनीत करावे असे उरलेल्या ‘आर.ए.सी.’ साहित्यिकासकट सर्वांचे मत पडल्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदी विराजमान झाले.
.
काही वर्षांपूर्वी ठरलेल्या विभागीय – प्रांतीय रोटेशन पध्दतीने यंदा विदर्भाची पाळी असल्यामुळे कुठलाही वितंडवाद न होता संमेलन विदर्भात करण्याचे ठरले. आणि विदर्भ साहित्य संघाच्या खेळीमेळीत पार पडलेल्या सभेत परस्परांना आग्रह करीत अखेर खुद्द नागपूर येथे संमेलन घेण्याचे ठरले.

पहिल्या दिवशी नव निर्वाचित (सॉरी..मनोनीत. स्वप्नात सुद्धा तोंडवळणी पडलेलेच शब्द बाहेर येतात ह्याची स्वप्न मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी नोंद घ्यावी)..नव मनोनीत अध्यक्षांचे स्वागत आणि ग्रंथ दिंडी असा कार्यक्रम होता. नव्या अध्यक्षांच्या स्वागताला मावळते अध्यक्ष उपस्थित न राहिल्या मुळे काही भुवया उंचावल्या गेल्या आणि काही कॅमेरे सरसावले गेले खरे पण स्थानिक आयोजकांनी मावळत्या अध्यक्षांना “अध्यक्ष येऊन राहिलेत” असा निरोप पाठवल्यामुळे आणि त्यांनी त्याचा अर्थ “ऑलरेडी आलेत आणि कुठेतरी मुक्कामाला राहिलेत” असा घेतल्याने गोंधळ झाल्याचे कळताच भुवया पूर्ववत झाल्या आणि कॅमेरे म्यान झाले.

ग्रंथ दिंडीत विविध ग्रंथ ठेवले होते. अमुक ग्रंथ का? असे वाद न होता “हा ही ठेवा हा ही असुदे” असे करत पालखी चांगलीच वजनदार झाली आणि साहित्याच्या खऱ्याखुऱ्या “धुरीणांचा” शोध घ्यावा लागला. दिनदर्शिकांच्या मागील पानावरील साहित्य आजवर दुर्लक्षित झाल्यामुळे यंदा पहिल्यांदाच दिनदर्शिकांचाही समावेश यंदाच्या दिंडीत करण्यात आला.
.
.sahityasammelan

.

.

.

.

.

.

तरुण साहित्यिकांसाठी स्वतंत्र मांडवात स्वतंत्रपणे सत्रे आयोजित करण्यात आली. “फू बाई फू ह्या गाण्याची विडंबने आणि पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांचे भावविश्व” ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला. सर्व पक्षांच्या विद्यार्थी – युवक संघटना, विविध व्यसनमुक्ती केंद्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि मनोविकारतज्ज्ञ ह्या परिसंवादात सहभागी झाले.

कविसंमेलन हा अन्यथा “लॉ अँड ऑर्डर” चा प्रश्न बनत चाललेला कार्यक्रम फारच शांतपणे आणि सुनियोजित पद्धतीने पार पडला. ज्येष्ठ कवि एकमेकाला आग्रह करत आहेत आणि परस्परांच्या कवितांना दाद देत आहेत असे मनोहारी दृश्य नागपूरकरांना प्रत्यक्षपणे आणि जगभर पसरलेल्या रसिकांना दूरदर्शनवर पाहायला मिळाले. कै. ग्रेसांच्या सन्मानार्थ त्यांच्या कविता वाचण्यात आल्या आणि एरव्ही गूढ – अगम्य मानल्या गेलेल्या आणि ‘गाणं’ नं झालेल्या कवितांना जेव्हा ‘वन्समोअर’ मिळाला तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.

या संमेलनात पहिल्यांदाच रस प्रधान साहित्य पुरस्कार देण्यात आले आणि नव रसांची निर्मिती करणाऱ्या साहित्याचा गौरव करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की अद्भूत रस प्रधान साहित्य म्हणून ‘आदर्श अहवाल’ आणि ‘सिंचन अहवाल’ ह्या दोन सरकारी प्रकाशानांना पुरस्कार विभागून देण्यात आला. पुरस्कार घेताना मा.मुख्यमंत्र्यांनी साहित्य मंडळाचे आभार मानले आणि संमेलनाला सरकारी मदत न स्वीकारण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे कळवळून आवाहन केले. शेजारील राज्यात स्थानिक भाषांतील साहित्यावर दरवर्षी वाढते बजेट असून महाराष्ट्रात मात्र साहित्यिकांच्या ‘नैष्ठिक आग्रहांमुळे’ जे थोडेफार बजेट असते तेही न खर्च होता परत जाते ह्याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. हे, कल्याणकारी राज्य म्हणून नामुष्कीचे तर आहेच पण निवडणून वर्षात राजकीय दृष्ट्याही गैरसोयीचे असल्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे हृदयाला हात घालणारे आवाहन केले. शिवाय ‘लोकराज्य’ ला अतिथी संपादक म्हणून दर महिन्याला एका साहित्यिकाची (घसघशीत मानधनावर!) सन्मानपूर्वक नियुक्ती करण्याची घोषणाही जाहीर केली.

ह्या अकल्पित आनंदाच्या धक्क्याने मला जाग आली तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि घड्याळात आठ वाजले होते. आलेल्या ताज्या पेपरचा जवळजवळ ‘रद्दी’ नावाचा आयसोटोप झाला होता. त्यात साहित्य संमेलनाच्या नव निर्वाचित अध्यक्षाच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे वक्तव्य होते. आपल्या भाषेतील साहित्याला नोबेल पुरस्कार तर जाऊच द्या पण विना तंट्याचे विना वादंगाचे साधे साहित्य संमेलन देखील आपल्या नशिबात नाही ह्या जाणीवेने माझे डोळे पुन्हा पाणावले आणि मी पेपर बंद केला.

…इति स्वप्न आसव दत्तम्.

(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक,  डिसेंबर २०१३)

Posted in विनोदी/ उपरोधिक | 6 प्रतिक्रिया

2013 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog.

Here’s an excerpt:

A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 4,700 times in 2013. If it were a NYC subway train, it would take about 4 trips to carry that many people.

Click here to see the complete report.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा