
पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कृष्ण-विवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. आपल्या पासून साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या त्या अद्भुताचे चित्र बघताना अंगावर काटा आला. १९६० च्या दशकाच्या शेवटी चंद्रावर माणसाने ठेवलेले पाऊल असेल, १९७० च्या दशकात भारताने अंतराळात सोडलेला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह असेल, पोखरण येथे केलेला पहिली अणु-चाचणी असेल, १९८० च्या दशकात भारताचा पहिला अंतराळवीराने, राकेश शर्माने, रशियाच्या सोयुझ अवकाश-यानातून केलेले पहिले उड्डाण असेल – माझ्या वयाच्या पंचविशीच्या आत घडलेल्या ह्या घटना होत्या. त्या प्रत्येक वेळी असाच अनुभव आला होता. विशाल अंतराळाचा, सृष्टीच्या उगमाशी जोडलेल्या शाश्वत सत्याचा किंवा अणूतील सूक्ष्म कणांपासून ते अनेक आकाशगंगांना सामावत सतत वृद्धिंगत होणाऱ्या विशाल ब्रम्हांडाचा कोणी वेध घेण्याचा कुठलाही लहान-मोठा प्रयत्न मनात अशाच सुखद लहरी निर्माण करतो.
स्वत: शास्त्रज्ञ वगैरे नसलेल्या मला अशा प्रसंगी पुन:पुन्हा कविवर्य वसंत बापट यांची अकरावी दिशा ही कविता आठवते. गम्मत म्हणजे वर उल्लेखलेली शास्त्रीय घटना घडण्याच्या कितीतरी आधी ही कविता लिहिली गेली आहे. बहुदा १९६०-६१ च्या सुमारास वा अजूनही आधी! विवध दिशांनी येणाऱ्या नव-नवीन अनुभवांचे स्वागत करण्यासाठी बापट एकेका दिशेला असणाऱ्या भिंती हलवण्याचा आग्रह धरतात. जणू अज्ञानाच्या, अल्प-संतुष्टतेच्या, स्थितिप्रिय असण्याच्या बेड्या तोडायला सांगतात आणि क्षितिजावर अवतरणाऱ्या नव्या आविष्कारांना सामोरे जाण्याचे आवाहन करतात. बापट लिहितात… एकेका दिशेचा नामोल्लेख करत लिहितात…
एक भिंत हलवा किमान, ही इथली उत्तरेची.
ध्रुवाच्या स्निग्ध प्रकाशाने उजळलेला वारा
येऊ दे केशरफुलांच्या पायघड्यावरून.
मग उरलेल्या कडव्यात बापट उत्तर दिशेच्या संदर्भात ऐतिहासिक घटनांचा, वस्तूंचा, भू-वैशिष्ट्यांचा, पशु-पक्षांचा संदर्भ देत त्या वाऱ्याविषयी, ‘त्याला वाट द्या’ असे आवाहन करतात.
मग पाळी येते पूर्व दिशेच्या भिंतीची… बापट म्हणतात…
“अंदमानच्या अंधारातून उगवणाऱ्या आरक्त सूर्याला अडवू नका.” मग त्या कडव्यात भारताच्या पूर्व प्रदेशातील कोणार्कचे, पूर्वेकडील कवींच्या रचनात असणाऱ्या अष्टपदीचे, पूर्वांचलाच्या बैठ्या देवालयांवरील पताकांचे, गड-किल्ल्यांचे, गोदावरीच्या मुखापासून पसरलेल्या बंगालच्या उपसागराचे अशी अनेक लोभस वर्णने येतात. पूर्व दिशेनी येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहन करत ते कडवे संपते.
एकेक कडवे संपले तरी बापट काहीतरी अजून सांगायचा प्रयत्न करत आहेत. ते कधी उलगडणार आपल्यासमोर अशी चुटपूट प्रत्येक कडवे लावतंच जाते. पुढे बापट पश्चिमेची आणि दक्षिणेची भिंत हलवण्याचे देखील क्रमाने आवाहन करतात. पश्चिमेकडील विशाल सागरांचे, भारताच्या पश्चिम किनाऱ्या पासून ते स्पेन मधल्या माद्रिद मधील बैलांच्या झुंजी पर्यंतच्या विविध प्रतिमांचा गोफ बापट लीलया गुंफतात. दक्षिण भारतातील मराठेशाहीच्या दक्षिण दिग्विजयाचे संदर्भ ह्या मराठी कवीच्या लिहिण्यात न आले तरच नवल. पण हे सारे ‘आपले’ वाटणारे, ‘आपले’ असलेले अनुभव भोगून, अनुभवूनही शेवटी ते त्या-त्या दिशेच्या भिंती दूर करण्याचे व नव्या क्षितिजावर येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहनही सातत्याने करतच असतात आणि “…आता पुढे काय” ह्या हुरुहुरीच्या आवर्तात रसिक वाचकाला ओढून नेतात.
माणूस अज्ञाताचा ध्यास घेतो, विश्वाच्या उगमाच्या प्रक्रियांचा शोध घेतो, नेहमी किरणांसारखा वाटणारा प्रकाश, कणांच्या सारखा का वागतो ह्याच्या मुळाशी जातो, जिथून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतात त्या दूरस्थ अद्भुताची समीकरणे मांडतो. ज्ञात असलेल्या दहा दिशांच्या पलीकडला तो प्रांत असतो. आपल्या अनुभवपटला समोर ‘आता संपले’ असे वाटणारी भिंत एकेका शास्त्रज्ञाने हलवली तेव्हा कुठे ह्या अज्ञाताच्या देशेचा वेध त्यांना घेता आला. जणू त्या नंतर फुटणाऱ्या वाटांबद्दलच बापट पुढे लिहितात…
“ठेवणारच असाल सगळ्या भिंती – तर ठेवा मग!
निदान हे छप्पर ठेवू नका – ओझ्याच्या वजनाचे…
इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची…
ब्रह्महृदयाची ती अधीर खूण तुम्हाला दिसत नाही का?
दोन मार्ग निघतात हे…वेदांची शपथ.
सूर्याच्या किरणांच्या पोलादी तारांवर,
तर्काच्या परशूने ताऱ्यांचे छेद करीत
सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही…”
तसा मी बापटांचा फॅन आहे. त्यांचे सर्व संग्रह माझ्या संग्रही आहेत. स्वत:च्या नसतील इतक्या बापटांच्या कविता मला मुखोद्गत आहेत. बापटांच्या कवितेच्या शेवटच्या कडव्याचा हा भाग वाचताच मी अनेकदा थांबलो आहे आणि पुन्हा-पुन्हा हा भाग वाचला आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी स्वत:च्या डेस्क वर इंटरनेटची जोडणी आली तेव्हा, घरातील पुढल्या पिढीच्या तोंडी ‘AI’, ‘IOT’ वगैरे शब्द आले तेव्हा मला नेहमीच ‘अकरावी दिशा’ आठवली आहे. बर्न शहरात आईन्स्टाईन यांच्या राहत्या घराचे केलेले म्युझियम बघताना, त्यांना मिळालेले नोबेल पदक बघताना, स्विझर्लंड – फ्रांस सीमेवर असलेला “लार्ज हॅड्रॉन कोलायडर” चा विशाल आणि अद्भुत प्रयोग बघताना, तिथे, विश्व निर्मितिच्या रहस्याचा वेध घेण्याच्या प्रयोगात रममाण झालेल्या शास्त्रज्ञांना बघताना, ‘हिग्स-बोसॉन’ कण मिळाल्याचे जाहीर करतानाची दृश्ये बघताना, मला नेहमीच ह्या ओळी आठवल्या आहेत. पुन्हा वाचाव्याशा वाटल्या आहेत. “सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही…” ह्या पेक्षा काय ठरवले असेल त्या त्या काळातल्या वैज्ञानिकांनी? “इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची…” असा नव्या ज्ञानमार्गाचा साक्षात्कार कसा झाला असेल शास्त्रज्ञांना?

सर्न मध्ये (CERN) म्हणजे युरोपीय अणुसंशोधन संस्थेच्या आवारात, भारताच्या सर्न मधल्या सहभागाचे प्रतिक म्हणून नृत्य करणाऱ्या शिवाची, नटराजाची मोठी मूर्ती आहे. भारताच्या ज्ञान-संपदेला नव्या संशोधन प्रक्रियेशी जोडणारे ते प्रतिक आहे. ते बघताना एक भारतीय म्हणून आनंद होतोच; शिवाय अशा अज्ञाताचा वेध घेणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांच्या बद्दल आपण नतमस्तक होतो. तिथे मला बापटांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी आठवल्या…
“सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही.
माझा मार्ग दुसरा आहे.
चंद्रकिरणांच्या लक्ष्मणझुल्यावर भोवळ आल्याशिवाय
कशी सापडणार आकाशगंगा?
तुम्हाला माहित आहे ना?
कोऽहं च्या हाकेला सोऽहं चा प्रतिसाद मिळतो
ते अनादी देठाचे ओंकार-कमळ मी शोधत आहे.
किरणातून येणाऱ्या त्याच्या परागांना वाट द्या,
अरे त्यांना वाट द्या,
तीच अकराव्या दिशेची धूळ आहे.
sharadmani@gmail.com
व्वा!
उत्तम आहे हे.
धन्यवाद!
खूपच छान………!
धन्यवाद ताई!
तुझी वैचारीक बैठक व बांधणी परिपक्व असल्याचा अभिमान वाटतो.
धन्यवाद! भेटूया एकदा.
धन्यवाद शुभानंद.
उत्तम लेख !
धन्यवाद सर!
खूप सुंदर लेख आहे दादा
धन्यवाद दोस्त!
वसंत बापट यांच्या ‘ अकरावी दिशा ‘ या सुंदर कवितेचा वैज्ञानिक शब्दवेध खूप आवडला. हा वेगळ्या पातळीवरचा अप्रतिम लेख मी दोन तीनदा तरी वाचला.
कृष्ण विवर हा माझ्या आवडीचा,चिंतनाचा आणि अध्यात्मिक तत्वज्ञानाशी ताडून पहाण्याचा विषय आहेच. आपण या लेखात बापटांच्या कवितेचे सुंदर रसग्रहण करून तिला जो वैज्ञानिक आयाम दिला आहे तो खूप मनोवेधक आहे. अशावेळी प्रा.मोहनराव आपटे आठवत रहातात.
असे शब्द म्हणजे लिहिणाऱ्यासाठी tonic. खूप खूप धन्यवाद.